TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 ऑगस्ट 2021 – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन अदानी समूहाने ताब्यात घेतले आहे. यानंतर अदानी समूहाने विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर ‘अदानी एअरपोर्ट’ असा फलक लावला होता. शिवसैनिकांनी हा फलक उखडून फेकला आहे. यावर शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केलं नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच आहे, असे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केलं आहे.

शिवसैनिकांनी या फलकाची तोडफोड केल्याच्या कृत्यानंतर समर्थन करत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अदानी समूहाने मागील काही वर्षांत एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केलीय.

देशातील अनेक विमानतळांचे संचालन आता अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यामध्ये मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टचे संचालन पूर्णपणे अदानी समूहाकडे आहे. यानंतर अदानी समूहाकडून हा फलक लावला होता.

शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केलं नाही. शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेणार नाही. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार करत असेल, शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल जे झाले तेच पुढेही होत राहणार आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

अदानींनी ते विमानतळ विकत घेतले आहे का? –
छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव केवळ महाराष्ट्र आणि मुंबई नव्हे तर संपूर्ण जगात ओळखले जाते. याअगोदर येथे जीव्हीकेसारख्या कंपन्या होत्या. मात्र, त्यांनी असे कधीही केलं नाही.

विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असताना जाणूनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का करत आहात? अदानींनी ते विमानतळ विकत घेतले आहे का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलाय.

आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या जीव्हीके समूहाकडून अलीकडेच अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा ताबा स्वत:कडे घेतलाय. त्यासह, नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा ताबाही ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’कडे दिला आहे.

त्यानंतर तिथे अनेक बदल करताहेत. त्याचाच भाग म्हणून ‘अदानी एअरपोर्ट’ असा नामफलक लावला होता. वास्तविक हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाते. असे असतानाही तिथे अदानींचा फलक लागल्याने शिवसैनिक संतापले आहेत.. त्यातून हा फलक हटवला आहे.